क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली   

बदलते क्रीडा विश्व : शैलेंद्र रिसबूड, डोंबिवली

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सामोरे जाताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली पोकळी एकदम भरुन निघणे कठीण असले, तरी त्यांचे संघात नसणे ही इतरांना मिळालेली संधी असेल, अशी सावध प्रतिक्रिया निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी संघ घोषणेनंतर व्यक्त केली. विशेषतः कोहलीच्या अनपेक्षित निवृत्तीबाबत विचारले असता, दर्जा कायम राखणे आता शक्य नाही असे वाटल्याने हा निर्णय घेतला असावा, असे आगरकर म्हणाले. 
 
 विराट आणि रोहितसारख्या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे यात शंका नाही. ती भरून काढणे निश्चितपणे आव्हान असेल. मात्र, त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे आणि हीच आजवरची रीत राहिली आहे असे आगरकर यांनी सांगितले.कोहलीने गेल्या महिन्यात आपल्याशी संपर्क साधला आणि कसोटीतून निवृत्तीची इच्छा व्यक्त केल्याचे आगरकर यांनी नमूद केले. विराटने एप्रिलच्या सुरुवातीला आमच्याशी संपर्क साधला.
 
कसोटी प्रारूपाला जे काही देणे शक्य होते, ते आपण दिल्याची त्याची भावना होती. त्याने स्वतःसाठी एक दर्जा निर्माण केला होता आणि तो गाठणे यापुढे शक्य नाही असे वाटल्याने त्याने बहुधा निवृत्ती घेतली असावी असे आगरकर म्हणाले. रोहितही कर्णधार म्हणून यशस्वी ठरत होता. आम्ही गेले काही महिने दोघांच्याही संपर्कात होतो. त्यांना संघासाठी मैदानावर आणि बाहेरही दोनशे टक्के योगदान देताना पाहिले आहे.मात्र, आता फलंदाजीत अपेक्षित कामगिरी होत नसल्याने आपण दूर जाणे योग्य ठरेल असे त्यांना वाटले असावे असेही आगरकर म्हणाले. आता नवे पर्व सुरू झाले असे म्हणायला हरकत नाही.  काही तरी नवे घडवण्याची संधी आली आहे. परिस्थितीचे मूल्यांकन करूनच संघ निवडला गेल्याचे आगरकर यांनी सांगितले. 
 
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले, गेल्या काही वर्षांत रोहित आणि विराट यांनी भारतासाठी किती सामने जिंकले, हे त्यांच्या कामगिरीवरूनच दिसून येते. त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयाचा आदर करायला हवा. आता ही इतर खेळाडूंसाठी संधी आहे. अर्थात, आम्हाला त्यांची उणीव भासेल यात शंका नाही.
 

Related Articles